ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा, म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले.
पोरबंदरच्या वास्तव्यामध्येस्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी तीन खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, ‘‘स्वामीजी, न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्येएवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल.’’ शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वत: गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, ‘‘पहिले तीन खंड माझे पूर्णवाचून झालेले आहेत. तुम्हांला शंका असेल, तर त्यातले तुम्ही काहीपण विचारू शकता.’’
आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला, की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तीन खंडांतले उभे-आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्यापानावर असायचे, ते अर्धे-पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, ‘हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे.’
खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, ‘‘स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हांला कसे शक्य होते?’’ स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, ‘‘मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो, तसेच माझा तासन्तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते.’’ पुढे स्वामीजी म्हणाले, ‘‘असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो, तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो.’’
जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले, तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले, समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा तीन दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले, की मध्यभागी एक-दीड फर्लांग अंतरावर दोन शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर?
त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले, ‘‘ते काय आहे?’’ नावाडी म्हणाले, ‘‘त्याला श्रीपादशिला म्हणतात.’’ स्वामी विवेकानंदांच्या मनात आले, की आपली भारतयात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत; पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही. तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे. कन्याकुमारीच्या चरणी भारतयात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, ‘‘बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड.’’ नावाड्याने सांगितले, ‘‘तुम्हांला पाच पैसे मला द्यावे लागतील.’’ स्वामीजी म्हणाले, ‘‘माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे.’’ नावाडी म्हणाले, ‘‘ते तुमचे तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हांला सोडणार नाही.’’ स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, फर्लांग-दीड फर्लांग अंतर पोहत जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो, की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला, तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली, तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा-तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले, या माणसाला वाटेत काही संकट आले तर? दम संपला तर? स्वामीजी त्या खडकावर, शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले, की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे.
स्वामीजी त्यांना म्हणाले, ‘‘मी आता दोन-तीन दिवस इथेच राहणार आहे.’’ तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. तीन दिवस नुसते थांबले नाहीत. ते ध्यानस्थ बसले, त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे; पण त्यांच्या लक्षात आले, की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत. त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल, की आपण पाच पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले; पण त्यामुळेच स्वामीजींचा अंत:स्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, ‘‘जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंत:स्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे. थोडी संकटं असली पाहिजेत. थोडा विरोध असला पाहिजे. म्हणजे माणसातली अंत:स्थ चेतना फुलते.’’
स्वामीजी तीन दिवस आणि तीन रात्री तिथे राहिले. तीन दिवस, तीन रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते. डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत. आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले, की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत. ज्यांना जेवायला अन्न नाही, त्यांना आपण वेदान्ताचा काय उपदेश करत असतो? भाकरीची भ्रांत असताना, वेदान्त सांगणे धादांत खोटे आहे. लोकांना आधी दाेन वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्वप्रकाशक असतो. वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक असतो. हे सर्वधर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले.