१५. निरोप (भाग – ३)

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.
याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांति उद्याच्या जगाची.
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दु:खाचा;

मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.
नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.

मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.
अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
जिजा-लक्षुमींशी नाते.
तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी.
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!