२०. विचारधन

त्यांचे विचार-

‘विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात. (१) गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे, मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क अाहे तसाच तो इतरांनाही आहे. (२) मनाचा समतोलपणा राखावा. केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला नाही, म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता, आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच अापले हे स्वराज्य टिकवू शकतील. समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे.’

नामदार गोपाळ कृष्ण गोखले : हे लोकमान्य टिळकांचे समकालीन. उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी ‘सर्व्हंट्स आॅफ इंडिया सोसायटी’ नावाची संस्था स्थापन केली. ‘भारत सेवक समाज’ या नावाने आता ती परिचित आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत.

त्यांचे विचार- ‘आज सर्वांत अधिक गरज असेल, तर ती देशाच्या चारी कोपऱ्यांत ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोहोचायला हवे, की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर अाहे. बोलणे नको, काम हवे! आपण सारे भाऊ भाऊ आहाेत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यांत गुरफटून जाऊ नका. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी हाेत अाहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडवू तर भाग्योदय कसा होणार? आपल्या सर्व कामांत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत. राष्ट्राची उभारणी हे साेपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल.