थोडे आठवा.
वर्गातील साधारण उंचीच्या विदयार्थ्याएवढा लांब व जाड कागद घ्या. हा कागद भिंतीवर पक्का चिकटवा. त्यापुढे एका मुलाला उभे करा. दुसऱ्या मुलाला त्याच्या शरीराची बाह्यरेषा कागदावर काढायला सांगा.
आता वर्गातील एकेका विद्यार्थ्याला शरीराच्या बाह्यरेषेच्या आत पुढील आंतरेंद्रियांची योग्य ठिकाणे दर्शवायला सांगा. मेंदू, फुप्फुसे, हृदय, जठर
आता प्रत्येक इंद्रियाविषयी पुढील गोष्टी आठवा.
१. ते शरीराच्या कोणत्या पोकळीत असते ?
२. त्याचे कार्य कोणते ?
३. त्याचे संरक्षण करणारी हाडे कोणती ?
श्वसन
जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही गोष्टींची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. त्यासाठी आपला श्वासोच्छ्वास सतत चालू असतो. आपल्या शरीरात श्वासोच्छ्वासाचे काम करणारी इंद्रिये आहेत. पुढील पानावर त्यांची नावे व त्यांच्याविषयीची थोडी माहिती दिली आहे. ती समजून घ्या.
वरील आकृतीत श्वसनेंद्रिये दाखवली आहेत. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते. श्वासनलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुप्फुसांत शिरते. फुप्फुंसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना वायुकोश म्हणतात.
उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचीक पडद्यासारखा अवयव असतो. त्याला श्वासपटल म्हणतात.
श्वासपटल व त्याची हालचाल
श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखांतून पुढे वायुकोशात भरते. श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छ्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते.
वायूंची देवाणघेवाण
वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली, की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीकबारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागांत वाहून नेला जातो.त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साइड वायुकोशांमधील हवेत मिसळतो.उच्छ्वासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण होते.
पचन
अन्ननलिका, पचनेंद्रिये व त्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती घेऊ.
अन्ननलिका
आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते. म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचीक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका म्हणतात. या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार.
तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागांत एकसारखा नसतो. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या
भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिये म्हणतात. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचनक्रियेला मदत करतात.
पचनेंद्रिये
अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज गिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते
जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे. यात अन्न घुसळले जाते. जठरातील पाचक रसांमुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते. ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते.
प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे सात मीटर लांबीचे असते. आतड्यातील पाचकरसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात. येथे काही ग्रंथींच्या स्रावांची पचनास मदत होते. पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात.
प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे दीड मीटर लांबीचे असते. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते.
ती मलाशयात जमा होते. मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहते.नंतर गुदद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते.
शरीरातील ऊर्जा
श्वसनक्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागांत पसरतो.पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागांत पोचतात. त्यांपैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात.
हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहचला, की तेथे पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते.
रक्ताभिसरण
अन्नातील इंधनपदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांत पोचवण्याचे काम रक्तवाहिन्यांतून सतत वाहत असणारे रक्त करते; पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते ?
हे काम होण्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन शिथिलीकरण होत असते, हे तुम्ही शिकला आहात. हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले असते.
शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला ‘रक्ताभिसरण’ म्हणतात. आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरीक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था’ म्हणतात. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू राहते.
चेतासंस्था
श्वासपटल, हृदय, पचनसंस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात, की आपल्या कळत नकळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदाहरणार्थ, बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे.
या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी, योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला समन्वय साधणे असे म्हणतात हे तुम्ही शिकला आहात. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेशवहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना ‘चेतातंतू’ म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते.
शरीरातील इतर संस्था
श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था या संस्थांविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतली. याशिवायही आपल्या शरीरात अनेक संस्था आहेत.
उदाहरणार्थ, शरीराला आधार, आकार देणारी, महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जनसंस्था.
या सर्व संस्थांची कार्ये अत्यंत गुंतागुंतीची असतात, त्याविषयी माहिती असणे महत्त्वाचे असते.