२. इतिहासाची साधन

२.१ भौतिक साधने
२.२ लिखित साधने
२.३ मौखिक साधने
२.४ प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने
२.५ इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी

आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना ‘इतिहासाची साधने’ म्हणतात.

इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत : भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने.

२.१ भौतिक साधने

दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेकवस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्परसंबंधांची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यांवरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तूकिंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ‘भौतिक साधने’ म्हणतात.

२.२ लिखित साधने

अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांतून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली.

 माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हेयांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यांपासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली.

सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले, तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तान्त इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक-सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवासवर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची ‘लिखित साधने’ असे म्हणतात.

२.३ मौखिक साधने

ओव्या, लोकगीते, लाेककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यान्‌पिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखेलोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची ‘मौखिक साधने’ म्हणतात.

२.४ प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने

अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इ. स. पू. १५०० पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्येब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण व महाभारत ही महाकाव्ये, जैन व बाैद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशंाची प्रवासवर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्त्वीय उत्खननांत सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो.

२.५ इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी

इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे, म्हणून तो विश्वासार्ह असेलच, असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास- लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते.