मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणताहेत हे पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, ‘‘तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय?’’ मुले म्हणाली, ‘‘अलबत्! आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत!’’ मी विचारले, ‘‘तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता?’’
मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता!
‘‘तुमची आई तुमच्यावर प्रेम करते?’’
‘‘हो हो, करते तर!’’
‘‘प्रेम करते म्हणजे काय करते?’’
‘‘आमचे पालनपोषण करते, आम्हांला वाढवते.’’
‘‘मग देशावर प्रेम करायचे, तर तुम्ही काय कराल?’’
‘‘देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू.’’
‘‘पण देश म्हणजे काय?’’
‘‘देश म्हणजे देशातील सर्व लोक.’’
‘‘देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे; पण देशबांधवांवर करणे अवघड, होय ना?’’
‘‘हो, खरे आहे.’’
‘‘भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात!’’
‘‘म्हणजे?’’ ‘‘देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?’’ ‘‘बरोबर आहे.’’ मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, ‘‘भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते.’’
मी विचारले, ‘‘ते खरेच आहे; पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते, की नेहमी असायला हवे?’’
एक मुलगा म्हणाला, ‘‘नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी, म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे?’’
‘‘एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि ‘भारतमाता की जय!’ असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि ‘भारतमाता की जय’ म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत ‘भारतमाता’ म्हणजे भारतातले सर्व लोक, ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे.’’
एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, ‘‘पण प्रेम करायचे म्हणजे काय?’’ मी म्हणालो, ‘‘प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दु:ख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला, की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पािहजे.’’
‘‘हास्य आणि अश्रूंची भाषा?’’ ‘‘हास्य आणि अश्रूयांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. प्रेम सक्रिय पाहिजे. तसे सुबुद्धही हवे.’’
‘‘पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय?’’
‘‘शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे, की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासीयांवर काय होईल? आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेल मोठे काम लहान असते आणि नि:स्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते! संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना?’’
‘‘हो, ऐकले आहे ना!’’
‘‘ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच; पण देशासाठी हे सणंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे! आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यांत फरक असेल की नाही?’’
‘‘हो, फरक असायला हवा.’’ ‘‘हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो. त्यात काही फरक आपल्याला जाणवतो?’’
‘‘आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना!’’ ‘‘अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप्धप् करू लागला, की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही?’’ ‘‘आईची शाबासकी ती आईची शाबासकी! यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले?’’
‘‘तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोई आपणच निर्माण करत असतो. एस. टी. च्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच-अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात; पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही.’’
मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही, त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल.
सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले, तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याप्रमाणे यच्चयावत मानवमात्रावर प्रेम करायचे म्हटले, तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते.
ती ओळखूनच ‘खरा धर्म’ या कवितेत साने गुरुजी म्हणतात, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.’ अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल, की ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे.’
खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडेबोडके दिसले असते का? ‘सस्यश्यामला माता’ असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे, की ती भूमी सस्यश्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे, तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल, तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको? इथली हवा, पाणी, निसर्गबिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय?
ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील, तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का?
माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर ‘वंदे मातरम्’ गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा, यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसांत भांडत राहिलो, तर ते भारतमातेला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल, तर सर्व समाजघटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे, हे एक प्रकारचे ढोंगच होईल!
‘वंदे मातरम्’ गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे, म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे, म्हणजेच देशावर प्रेम करणे.