या पाठात आपण शिवपूर्वकाळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्येविविध राजसत्ता अस्तित्वात होत्या.
आठव्या शतकातील ‘पाल’ हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. मध्य भारतात गुर्जर-प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनोज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला.
उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होत. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव केला.
मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. तमिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला.
महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनोजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला.
शिलाहारांची तीन घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागांवर राज्य करत होते.
शिवपूर्वकाळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ताविस्तार केला.
यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला.
वायव्येकडील आक्रमणे
महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला.
दरम्यानच्या काळात मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. आठव्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहीर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली.
इसवी सनाच्या अकराव्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यांत त्याने मथुरा, वृंदावन, कनोज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. बख्त्यार खल्जी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले.
उत्तरेतील सुलतानशाही
इसवी सन ११७५ आणि ११७८ मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमणे केली. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इ.स.१२०६ मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. इ.स.१२१० मध्ये त्याचा मृत्यू झाला.
माहीत आहे का तुम्हांला ?
कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया, बल्बन, अल्लाउद्दीन खल्जी, मुहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहीम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले.
इब्राहीम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहीम लोदीविरुद्ध पाचारण केले. या लढाईत बाबराने इब्राहीम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला.
विजयनगरचे राज्य
दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.
हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स. १३३६ मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील ‘हंपी’ ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय.
हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आधिपत्याखाली आणला. आपल्या
कृष्णदेवराय : कृष्णदेवराय इ.स.१५०९ मध्ये
विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूदशाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. इ.स. १५३० मध्ये त्याचा मृत्यू झाला.
कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगु भाषेमध्ये ‘आमुक्तमाल्यदा’ हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले.
लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले.
कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इ.स. १५६५ मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले.
बहमनी राज्य
मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इ.स. १३४७ मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील ‘गुलबर्गा’ येथे आपली राजधानी स्थापन केली.
महमूद गावान : हा बहमनी राज्याचा मुख्य
वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विदयांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली.
महमूद गावाननंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतांतील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची पाच शकले झाली.
मुघल सत्ता
इ.स.१५२६ मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली.
बाबर : बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. म्हणून
दिल्लीमध्ये त्या वेळी इब्राहीम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलतखान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहीम लोदी आणि दौलतखान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलतखानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहीम लोदी सैन्य घेऊन निघाला. २१ एप्रिल १५२६ या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहीम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. ही ‘पानिपतची पहिली लढाई’ होय.
या लढाईनंतर मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला. इ.स. १५३० मध्ये बाबराचा मृत्यू झाला.
अकबर हा मुघल घराण्यातील सर्वांत कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.
महाराणा प्रताप : उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चाल ठेवला. ू महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले.
चांदबिबी : इ.स.१५९५ मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. या वेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही.
राणी दुर्गावती : विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्यप्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्लमानाने गोंडवनाचा थू विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गा वती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मांतील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मांतील उदात्त तत्त्वांचा समन्वय करून अकबराने ‘दीन-इ-इलाही’ हा धर्म स्थापन केला, मात्र त्याने दीन-इ-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही.
औरंगजेब : शाहजहान बादशाहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्तास्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून इ.स.१६५८ मध्ये बादशाह झाला. शाहजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने पन्नासहून अधिक सस्ं कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशाह झाला त्या वेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला जोडले.
आहोमांशी संघर्ष : इसवी सनाच्या तेराव्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना आहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधरसिंह याच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले. लाच्छित बडफूकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना अासाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.
शिखांशी संघर्ष : शिखांचे नववे गुरू गुरुतेघबहाद्दर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून १६७५ मध्येत्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्यानंतर गुरुगोविंदसिंग हे शिखांचे गुरू झाले.
गुरुगोविंदसिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले. त्यास ‘खालसा दल’ असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्या वेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरुगोविंदसिंग दक्षिणेत आले. इ.स.१७०८ मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले.
राजपुतांशी संघर्ष : अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंतसिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंतसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला.
मराठ्यांशी संघर्ष : महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नांमध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशीही संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला. आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोत.