६. मुघलांशी संघर्ष

आतापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी यशस्वी संघर्ष केलेला होता; परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशीही संघर्ष अटळ होता. स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचे संकट आले. महाराजांनी याही संकटावर मात केली. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले. स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली. या सर्व घटनांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.

शायिस्ताखानाची स्वारी : फेब्रुवारी १६६० मध्ये शायिस्ताखान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबर हानी केली. चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला. परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला.

शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महालात शायिस्ताखान तळ ठोकून बसला. तेथून आसपासच्या मुलखाची त्याने लूट चालूच ठेवली. दोन वर्षे झाली, तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्याचा विचार करत नव्हता. त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणे स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत महाराजांनी एक धाडसी बेत आखला.

शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली. त्यानुसार ५ एप्रिल १६६३ रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. या छाप्यात शायिस्ताखानाची बोटे तुटली. त्याची मानहानी झाली. त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. या प्रकारामुळे त्याने औरंगजेबाची नाराजी ओढवून घेतली. औरंगजेबाने त्यास बंगालच्या सुभ्यावर पाठवले. शायिस्ताखानवरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील प्रजेचा विश्‍वास अधिकच वृद्‌धिंगत झाला.

सुरतेवर स्वारी : शायिस्ताखानाने तीन वर्षांच्या काळात स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला होता. त्याची भरपाई करणे आवश्यक होते. त्यासाठी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली. मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते. तेथे इंग्रज, डच व फ्रेंच यांच्या वखारी होत्या. हे शहर बादशाहाला सर्वांत जास्त महसूल देत होते. तसेच ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली. सुरतेचा सुभेदार इनायतखान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही. सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. यामुळे औरंगजेब बादशाहाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला.

जयसिंगाची स्वारी : शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंग हा आपला अनुभवी आणि मातब्बर राजपूत सरदार पाठवला. तो पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याचे सिद्दी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी, असे जयसिंगाने त्यांना सुचवले.

शिवाजी महाराजांकडील किल्लेजिंकून घेण्याचा बेत आखला. स्वराज्याच्या विविध भागांत मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली, परंतु त्याला वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग व महाराज यांच्यात जून १६६५ मध्ये तह झाला. हा तह ‘पुरंदरचा तह’ म्हणून ओळखला जातो. या तहानुसार महाराजांनी मुघलांना तेवीस किल्ले व त्यांच्या भोवतालचा वार्षिक चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. आदिलशाहीविरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्‍वासनही दिले. या तहास औरंगजेबाने मान्यता दिली.

आग्रा भेट व सुटका : पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाहीविरुद्ध मोहीम हाती घेतली. महाराजांनी जयसिंगास मदत केली, तथापि त्याची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्या वेळी, महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे, असा विचार जयसिंग व औरंगजेब बादशाह यांनी केला. या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांनी बादशाहाच्या भेटीस जावे, असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची हमीदेखील दिली. त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. बरोबर राजपुत्र संभाजी होते. तसेच, विश्वासू आणि जीवास जीव देणारे निवडक सहकारीही सोबत होते.

महाराज आग्ऱ्यास पोहचले. तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशाहाने त्यांना नजरकैदेत ठेवले. बादशाहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्ऱ्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहचले. आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी यांनी सांभाळला.

मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा : महाराजांना मुघलांबरोबर लगेचच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्‌दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी एक व्यापक व धडाडीची योजना तयार केली. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशांवर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचे, असे हे धोरण होते. यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले. पुढे एकापाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले.

यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी-दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊदखान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे याने नाशिकजवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला.

अशारीतीने महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या धोरणास यश मिळाले. या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली. या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने पुढीलप्रमाणे केले आहे “चहू महिन्यात सत्तावीस गड घेतले. मोठी ख्याती केली. “

राज्याभिषेक सतत तीस वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठयांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे, हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे, हे महाराजांच्या लक्षात आले. यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी ६ जून १६७४ या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला.

या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी द ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. 5 ते आता शककर्ते झाले. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा ‘होन’ व तांब्याची ‘शिवराई’ ही खास

नाणी पाडली. या नाण्यांवर ‘श्री राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे कोरण्यात आली. तेथून पुढे राजपत्रांवर ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करवून घेतला. यालाच ‘राज्यव्यवहारकोश’ असे म्हणतात.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो, “मऱ्हाटा पातशाह येव्हढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. ” यानंतर महाराजांनी अल्पावधीत २४ सप्टेंबर

१६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या दोन परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतींनी राज्याभिषेक करवून घेतला.

दक्षिणेची मोहीम : राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर १६७७ मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह

केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे, तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते याची नेमणूक केली.

शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्यकार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. व्यंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील ‘सरस्वती महाल’ हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले.

मुघल बादशाह आैरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्या वेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथून स्वराज्याचा कारभार चालवला.

शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत ३ एप्रिल १६८० रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या पन्नाशीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला.