माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णा भाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णा भाऊ साठे यांनी मला ‘‘चिरागनगरात येऊन भेटा’’, असा भिकाजी तुपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलावलं म्हणजे, काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी चारच्या सुमारास चिरागनगरीची, खाचखळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत, अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला ‘‘अण्णा भाऊ साठेंचं घर कोणतं?’’ म्हणून विचारलं.
ती म्हणाली, ‘‘ही बगा, डाव्या अंगानं आसंच म्होरं जावा, थितं च्यावाल्याचं हाटील हाय, आंगं तेच्याच म्होरल्या आंगाला इचारा. थितंच जयवंताबाय ऱ्हातीया.’’ मी म्हणालो, ‘‘आहो ताई, मी अण्णा भाऊ साठेंचं घर विचारतोय.’’
ती म्हणाली, ‘‘आवं, मग मी तेच की सांगतीया. आवं, जयवंता बाय हायना, ती अण्णांची मालकीण हाय. जावा कडंकडंनं, चिरागनगरातली ही वाट सदान्कदा चिखलापान्यात लोळत पडलिया-कडंकडंनंच जावा.’’
मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, ‘‘अण्णा भाऊ साठेंचं घर कोणतं?’’ ‘‘वो क्या, वो पांचवा झोपडा है ना, वहांच अण्णा रहेता है ।’’ त्यानं दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णा भाऊंना हाक मारली. साडेचार फूट उंचीची माझ्यासारखीच काळीसावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णा भाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. ‘‘तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना?’’ मी ‘‘होय’’ म्हणालो. ‘‘या’’ असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं.
अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजीफ्राक (बनियन) घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णा भाऊंचं घर दाखवलं त्याच चहावाल्याच्याहॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी ‘‘शाहीर, तुम्ही केव्हापासून गाता?’’ वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने; पण लाजतबुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, ‘‘तुम्ही फार चांगलं गाता, तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव. मला रहावेच ना. तुम्हांला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला.’’
अण्णा भाऊंची व माझी पहिली भेट १९६३ वा ६४ सालात झाली असावी.
‘‘अण्णा भाऊ, आपण थोर साहित्यिक आहात, आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो.’’ असं म्हणताच अण्णा हसले. ‘‘आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका.’’
एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणूकाही फार वर्षांची आमची ओळख आहे, अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं, वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो.
अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो, तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चश्मा डोळ्याला लावून अण्णा लिहीत होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहीतच असत. पाचेक मिनिटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठेवहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एकच जरमनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा; लेंगा-हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गॉर्कीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं, की अण्णा गॉर्कीला गुरू मानतात, तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना, एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं. ‘केव्हा आलात’ विचारलं. ‘नुकताच आलो’ असं मी सांगितलं.
मी चिरागनगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्याविना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला.
एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली, त्या ऐंशी पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले दोन प्रकाशक आले, त्यांनी अण्णांच्या ऐंशी पानी दोन वह्या घेतल्या. माझ्यासमक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन ‘बरं, अण्णा येतो’ असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर! मी विचार करतच राहिलो.
कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, ‘‘बाय, मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन.’’ अण्णांचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो, ‘‘अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय.’’ अण्णा ‘‘होय’’ म्हणाले.
‘‘अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. आलिशान बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं-सगळं सगळं थाटामाटाचं करता येईल आणि अण्णा, तुम्हांला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबललॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या, असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचंलिखाण सरस होईल.’’
अण्णा हसत हसतच म्हणाले, ‘‘विठ्ठला, बंगला, मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या सर्वसाधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांची दु:खं मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढूनताणून काल्पनिक लिखाण होईल, झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात, पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी भगुलं, परात कशी लावली जाते, थंडीच्या महिन्यांत दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं, इथं दु:खाला झेलत जगणारी माणसे-त्यांची पालं-त्यांच्या हाणामाऱ्या, विठ्ठल, काय सांगू-अरे, वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचंसत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारखा होईन, म्हणून मला ते मानधन नको.’’