८. वाट पाहताना

होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर; पण मार्च-एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं.

 रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले, की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, ‘उद्या कोकिळेचं ‘कुहू’ ऐकू येईल का? बघू हं!’ पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो ‘कुहूऽकुहूऽ’ आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं.

 सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया- पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं…सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही!

आमच्या भल्यामोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली, तरी आख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर…! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स!

आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ्ठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची…

पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधीपण, केव्हापण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाट्टेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री-मध्यरात्रीसुद्धा; पण मला मात्र कधीकधी खूप वाट बघायला लावायची.

मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं-अस्वस्थ होणं-कशातच मन लागेनासं होणं-आई, आत्याची ती बोलणी खाणं! आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं.

आमची आत्या तेव्हा उरुळीकांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी. परतताना तसंच, गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ-साडेनऊसुद्धा व्हायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली, की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून, तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं; पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची.

 अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा. ‘पोस्टमन इन द माउंटन’ हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला; पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या-वस्त्या पायी चालत हिंडायच्या, हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बाप-लेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं, त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं.

मुलगा जेव्हा पुढे होतो, तेव्हा त्याला दिसतं, की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते. आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो, की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पहात आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहीत नाही. तिची चौकशी करत नाही; पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन हाेत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा, म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे.

शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड-कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो.

हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आहे आणि वाटतं, की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी. थोडी तडफड भोगायला लागावी. तरच सुखाची चव वाढेल. यशाची गोडी वाढेल. प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल.